देशात 10 लाखांहून अधिक रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात
मुंबई – देशात कोरोनावर अनेकांनी मात केली आहे. जून आणि जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली होती. जुलै अखेरीस कोरोना रुग्णांच्या रिकव्हरीचा आकडा दिलासादायक असल्याचं पाहायला मिळत आहे.
भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आतापर्यंत आकडा 35 हजारवर पोहोचला आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या म्हणजेच रिकव्हर होणाऱ्यांची संख्या तब्बल 10 लाख आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात कोरोनाचा आकडा 15 लाख 84 हजार 384वर पोहोचला आहे.
24 तासांत देशात 50 हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत देशात 10 लाख 21 हजार 611 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोरोनाच्या आकडेवारीत जगभरात अमेरिका पहिल्या तर भारत तिसऱ्या स्थानावर आहे. कोरोनाचा संसर्ग जरी जास्त लोकांना होत असला तरी भारतात मृत्यूदराची टक्केवारी सर्वात कमी आहे आणि रिकव्हरी रेट सर्वात जास्त असल्यानं काहीसा दिलासाही आहे.
देशभरात कोरोनाचा कहर सुरू असताना पश्चिम बंगालसह अनेकांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात महाराष्ट्रातही लॉकडाऊन31 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे.