देशात २४ तासांत ६९ हजार ६५२ नवे रुग्ण
नवी दिल्ली – भारतात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत देशात ६९ हजार ६५२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ९७७ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने आता २८ लाखांचा टप्पा पार केला आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाबाधितांची संख्या २८ लाख ३६ हजार ९२६ वर पोहोचली आहे. तर कोरोनाबळींचा आकडा ५३ हजार ८६६ इतका झाला आहे. तसेच आतापर्यंत २० लाख ९६ हजार ६६५ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या ६ लाख ८६ हजार ३९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये देशात कोरोना चाचण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात ९ लाख १८ हजार ४७० कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ३ कोटी २६ लाख ६१ हजार २५२ कोरोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.