देशात पुन्हा पोलिओचा धोका
- महाराष्ट्र, उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट
नवी दिल्ली – भारत पोलिओमुक्त म्हणून घोषित करण्यात आला असला तरी यास सुरुंग लागण्याची शक्यता आहे. गाझियाबादमधील बायोमेड कंपनीद्वारे तयार करण्यात आलेल्या लसींमध्ये टाइप-2 पोलिओ व्हायरस आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिओ व्हायरस आढळल्याने देशावर पुन्हा पोलिओ संकट कोसळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बायोमेड कंपनीच्या या व्हायरसयुक्त लसी मुख्यत्वे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात वापरण्यात आल्याचं समोर आलं असून दोन्ही राज्यांना अलर्ट केलं असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत उत्तर प्रदेशात बायोमेड कंपनीकडून लस पुरवण्यात येतात. राज्यातील काही मुलांच्या विष्ठेमध्ये पोलिओ व्हायरसचे लक्षण आढळून आल्यानंतर बायोमेड कंपनीच्या लसींची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बायोमेड कंपनीच्या लसींमध्ये टाइप-2 पोलिओ व्हायरसचे अस्तित्त्व असल्याचं निष्पन्न झालं आहे.
बायोमेड कंपनीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून कंपनीच्या संचालकालाही अटक करण्यात आली आहे. बायोमेड कंपनीची लस उत्तर प्रदेश राज्यासह महाराष्ट्रातही वापरली जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे.