देशातील ट्रान्सपोर्टर्स 10 ऑगस्टपासून तीन दिवस संपावर
भोपाळ – देशातील आरटीओ सीमांचे चेकपोस्ट बंद करावे, डिझेलवरील वॅट कमी करावा, रोड टॅक्स आणि गुड्स टॅक्समध्ये सहा महिन्यांची सूट द्यावी, तसेच ट्रक, ट्रेलर, टेम्पो, टँकर चालकांचा कोविड विमा काढला जावा, या चार मागण्यांसाठी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या वतीने संपूर्ण देशभरात 10 ऑगस्टपासून तीन दिवस संपाची घोषणा केली आहे. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे दिल्लीचे अध्यक्ष कुलतरण सिंह आटवाल आणि मध्य प्रदेश वेस्ट झोन अध्यक्ष विजय कालरा यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने चक्काजाम आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.
कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ट्रान्सपोर्ट उद्योग मोठ्या संकटात सापडला आहे. प्रवासी आणि मिळत नसल्याने हजारो ट्रक, बस, टॅक्सी, टेम्पो इत्यादी रस्त्यावर धावू शकत नाहीत. अनेक ट्रान्सपोर्टरवर आपल्या ट्रक, टेम्पो, ट्रेलर या गाड्या विकण्याची वेळ आली आहे. या व्यवसायाशी जोडलेल्या हजारो लोकांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. ज्यांचा रोजगार वाचला आहे त्यांच्यावरसुद्धा टांगती तलवार आहे. त्यातच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेली जाचक बंधने आणि रोड टॅक्ससह लोनवर घेतलेल्या गाड्यांचे ईएमआय भरण्याचे संकट या ट्रान्सपोर्टरवर आले आहे. प्रवासी आणि मालाची ऑर्डर मिळत नसल्याने 80% गाड्या उभ्या आहेत. रोड टॅक्स देता येत नाही म्हणून अनेक लोकांनी गाड्या आरटीओ कार्यालयात सरेंडर केल्या आहेत. त्यामुळेच या वाहतूकदारांनी आपल्या चार प्रमुख मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर हे वाहतूकदार 10 ऑगस्टपासून तीन दिवस संपावर जाणार आहेत.