देशाचा कोरोनामुक्तीदर ९१ टक्क्यांच्या घरात
नवी दिल्ली – देशात केवळ ७.६४ टक्केच सक्रिय कोरोनाबाधित आहे. बुधवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९०.८५% नोंदवण्यात आला. गेल्या एका दिवसात सक्रिय रुग्णसंख्येत १५ हजारांची घट नोंदवण्यात आली. कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले असले, तरी देशवासियांनी योग्य काळजी घेण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे.
गेल्या एका दिवसात ४३ हजार ८९३ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली. तर, ५०८ रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी दिवसभरात ५८ हजार ४३९ रुग्ण कोरोनातून पुर्णत: बरे झाले आहेत.
देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे ७९ लाख ९० हजार ३२२ एवढी झाली आहे. यातील ७२ लाख ५९ हजार ५०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, ६ लाख १० हजार ८०३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दुदैवाने आतापर्यंत १ लाख २० हजार १० रुग्णांचा (१.५०%) कोरोनाने बळी घेतला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनूसार गेल्या एका दिवसात ७९% कोरोनारुग्ण हे १० राज्य, केंद्रशासित प्रदेशात आढळले.
सर्वाधिक कोरोनाप्रभावित महाराष्ट्रात ५ हजार ४५७ कोरोनारुग्णांची भर पडली. महाराष्ट्रासह केरळ (५,३६३), दिल्ली (४,८५३), पश्चिम बंगाल (३,९५७), कर्नाटक (३,६९१) तसेच आंध्र प्रदेशात (२,९०१) सर्वाधिक कोरोनारुग्णांची नोंद घेण्यात आली. गेल्या एका दिवसात झालेल्या एकूण कोरोनामृत्यूपैकी ७९% मृत्यू १० राज्यांमध्ये झाले. महाराष्ट्रासह (११५), पश्चिम बंगाल (५८), दिल्ली (४४), कर्नाटक (४४), उत्तर प्रदेश(३६), तामिळनाडू (२७) तसेच केरळमध्ये (२७) सर्वाधिक कोरोनामृत्यूची नोंद घेण्यात आली. देशात आतापर्यंत १० कोटी ५४ लाख ८७ हजार ६८० कोरोना तपासण्या करण्यात आल्या. यातील १० लाख ६६ हजार ७८६ कोरोना तपासण्या या मंगळवारी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.