देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले, तर आनंदच होईल’ – एकनाथ खडसे
मुंबई |महाईन्यूज|
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. ‘देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार असेल तर आनंदच आहे. ते दिल्लीत गेले तर महाराष्ट्राला सर्वाधिक उपयोग होईल, असे मत भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ खडसे यांनी सांगितले की, ‘देवेंद्र फडणवीस जर दिल्लीत येणार असतील तर स्वागत आहे. आपल्या सोबत काम करणारा नेता केंद्रात मंत्री होणार असेल तर याचा आनंदच आहे. फडणवीस दिल्लीत गेले तर महाराष्ट्राला चांगलाच उपयोग करुन घेता येईल. तसंच, दिल्लीत येणं, न येणं हे फडणवीसांच्या मर्जीवर नाही. तर वरिष्ठ नेत्यांनी ठरवलं तर तसा निर्णय होऊ शकतो, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.’
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे नेते सध्या दिल्लीमध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत प्रचार करत आहेत. दरम्यान, फोन टॅपिंग प्रकरणावर बोलताना खडसेंनी नाराजी व्यक्त केली आहे. मी सत्ताधारी पक्षात होतो. माझ्यावर फोन टॅपिंगने पाळत ठेवण्याची काय गरज होती? त्याचे काय कारण होतं? असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे.