देवेंद्र फडणवीस-गिरीश महाजन ‘माझं राजकारण संपवू लागलेत’ – एकनाथ खडसे
जळगाव |महाईन्यूज|
स्वत:चं राजकारण सरळ आणि सोयीचं व्हावं म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांनी माझं तिकीट कापलं. माझं राजकारण संपवण्याचा त्यांचा डाव आहे, असा आरोप माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केला. त्यांनी पहिल्यांदाच थेट नाव घेऊन आरोप केल्याने भाजपमध्ये सन्नाटा पसरला आहे.
एका वृत्तवाहिनीशी खास मुलाखत देताना एकनाथ खडसे यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावेळी कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी मला तिकीट देण्यास तीव्र विरोध केला होता. पक्षश्रेष्ठी मला तिकीट देण्यास अनुकूल असतानाही फडणवीस आणि महाजन यांनी त्याला विरोध केला.
कोअर कमिटीतील माझ्या मित्र आणि वरिष्ठांनीच मला ही माहिती दिली. स्वत:चं राजकारण सरळ आणि सोयीचं व्हावं म्हणून त्यांनी माझं तिकीट कापलं. माझं राजकारण संपवण्याचा हा डाव आहे, असा आरोप करतानाच तिकीट न देण्यामागे काय प्रयोजन आहे? असं मी पक्षश्रेष्ठींना वारंवार विचारलं. माझा गुन्हा काय? मी काय बदमाशी केली? असंही मी पक्षश्रेष्ठींना विचारलं. पण मला त्याचं उत्तर देण्यात आलं नाही, असं खडसे म्हणाला. माझ्याबाबत ही जाणीवपूर्वक खेळी करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.