मुंबई न्यायालयाने रियाचा दुसऱ्यांदा जामिना अर्ज फेटाळला
गेल्या दोन दिवसांपासून रिया चक्रवर्ती भायखळा तुरुंगात आहे. रियाने दुसऱ्यांदा तिच्या जामिनासाठी अर्ज केला होता. पण दोन्ही वेळा मुंबई न्यायालयाने तिचा जामिन अर्ज फेटाळून लावला आहे. शुक्रवारी सत्र न्यायालयाने रिया, शौविक यांच्यासह सर्व सहा आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्वांना तुरुंगातच रहावं लागणार आहे. एनसीबीने अटक केल्यानंतर न्यायालयाने रियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तिला भायखळा तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. तिला आणि शौविकला जामीन मिळावा यासाठी कायदेशीर प्रयत्नही करण्यात आले.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी जामीन अर्जावरील सर्व युक्तीवाद पूर्ण झाले होते. आज शुक्रवारी न्यायालयाने आपला निर्णय सुनावत रियासह शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत, झैद विलात्र आणि अब्दुल बासित परिहार यांनाही जामीन मंजूर केला नाही.
नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मंगळवारी रियाला अटक केली आणि त्याच दिवशी न्यायालयाने २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. यापूर्वी मंगळवारी दंडाधिकारी न्यायालयाने रियाला जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर रियाने दुसऱ्यांदा जामीनासाठी अर्ज केला. ज्याचा निर्णय आज होणार आहे.