दुर्दैवाने विद्यापीठात संशोधनावर भर दिल नाही, नितीन गडकरी यांची खंत
शहराचा, देशाचा विकास करताना संशोधनाची भूमिका महत्त्वाची आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून संशोधनाच्या मोठय़ा अपेक्षा होत्या. परंतु दुर्दैवाने येथे संशोधनावर भर दिला गेला नाही. या विद्यापीठाच्या तुलनेत माझ्या प्रयोगशाळेत होणारे संशोधन अधिक दर्जेदार आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विद्यापीठाचे कान टोचले.
विद्यापीठ शिक्षण मंच आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर हिंदी शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘स्मार्ट सिटी’वर आज शनिवारी आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. गुरूनानक भवन येथे आयोजित या कार्यशाळेच्या उद्घाटन सोहोळ्यात गडकरी बोलत होते. शवेळी प्रमुख पाहुणे म्हणून कॅनडा येथील पर्यावरणतज्ज्ञ पॅम कॅल्सी, विद्यापीठ शिक्षण मंचच्या कल्पना पांडे, डॉ. प्रमोद शर्मा, डॉ. संजय दुधे उपस्थित होते. गडकरी म्हणाले, विद्यापीठाने संशोधनावर भर दिला तर विदर्भातले अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल. स्मार्ट सिटीमध्ये आरोग्य, शिक्षण, वाहतूक यंत्रणा, पर्यावरण आणि पर्यावरशास्त्र या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आर्थिकदृष्ट्या देशासाठी पर्यायी इंधन हवे. ती क्षमता आपल्या देशात आहे. कचऱ्याचे रुपांतरण संपत्तीमध्ये करता येऊ शकते, पण ते नेतृत्त्वावर अवलंबून आहे, याकडेही गडकरींनी लक्ष वेधले. पॅम कॅल्सी म्हणाले, पर्यावरणावर बोलणारा मी एक छोटा माणूस आहे. वातावरणातील बदलामुळे शहराचे नियोजन करणाऱ्यांना विविध आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. शाश्वत विकास महत्त्वाचा आहे हे सांगताना त्यांनी सांडपाणी, सौर उर्जा, प्रदूषण आदी विषयांवर भाष्य केले. प्रास्ताविक कल्पना पांडे यांनी केले. दक्षिण अफ्रिका, थायलंड आदी देशातील सुमारे एक हजाराहून अधिक विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत.