राज्यातील १० जिल्हे वगळता कोरोनाची लाट अंतिम टप्प्यात
मुंबई – महाराष्ट्रातील कोरोनाचा विळखा आता हळूहळू सुटत चालला आहे.कारण राज्यातील १० जिल्हे वगळता कोरोनाची लाट अंतिम टप्यात आली आहे. विदर्भ, खान्देशातील एकूण १५ जिल्ह्यात गडचिरोली वगळता कोरोनाची रुग्णसंख्या एक आकडी आली आहे. मात्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आकडेवारी पाहता पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात अनलॉक होईल का? अशी आशा आहे.
राज्यात गेले तीन आठवडे कोरोनाची आकडेवारी एकाच ठिकाणी स्थिर आहे. आठवड्यात आकडेवारी ७ ते ८ हजार या दरम्यान कमी जास्त होताना दिसते आहे. राज्यातील १८ जिल्ह्यातील रोजची रुग्णसंख्या १५ पेक्षाही कमी आहे. त्यातील १० जिल्ह्यात एक अंकी रुग्णसंख्या आढळून आली आहे. मात्र, या तुलनेत कोल्हापूर, सांगली सातारा पुणे, पिंपरी चिंचवड मुंबई, रत्नागिरी, रायगड सिंधुदुर्ग, या दहा जिल्ह्यात राज्यातील ९० टक्के रुग्णसंख्या आहे