नगर जिल्ह्य़ात १३ उपचाराधीन करोना रुग्णांचा मृत्यू
- आणखी ८ गावांत टाळेबंदी लागू
नगर |
गावातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने आणखी ८ गावे प्रतिबंधित क्षेत्र जारी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील एकूण ६९ गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर झाली आहेत. दरम्यान गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात १३ करोना रुग्णांचा मृत्यू झाला तर रुग्णसंख्येत ४१३ ने वाढ झाली आहे. चांदा (नेवासा), निघोज, वाडेगव्हाण, टाकळीढोकेश्वर व आळकुटी (पारनेर) राजापूर, पिंपरी लौकी (संगमनेर), वडुले बुद्रुक (शेवगाव) ही आठ गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. हे बंधन आजपासून दि. १४ पर्यंत लागू राहील. दोन दिवसांपूर्वी ६१ गावे प्रतिबंधित क्षेत्र जारी करण्यात आले.
या गावातून शाळा व धार्मिक स्थळे बंद राहतील. किराणा दुकान सकाळी ८ ते ११ दरम्यान खुली राहतील. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. विवाह समारंभांना मनाई करण्यात आली आहे तर दशक्रिया विधींना केवळ २० जणांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आज ४८१ रुग्ण करोनामुक्त झाले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३७ हजार ३५२ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९७ टक्के झाले आहे. रुग्णसंख्येत ४१३ ने वाढ झाल्याने उपचाराधीन रुग्णांची संख्या ३ हजार ६४१ झाली आहे. आज आढळलेले करोनाबाधित पुढीलप्रमाणे— संगमनेर ८२, राहता ६४, अकोले ४३, पारनेर ४१, नगर तालुका ३४, कर्जत २७, राहुरी २७, शेवगाव २२, नगर शहर १४, नेवासे १४, जिल्ह्याबाहेरील ९, श्रीगोंदे ९, पाथर्डी ८, श्रीरामपूर ८, कोपरगाव ७, जामखेड ३, राज्याबाहेरील १.
- जिल्ह्याची आकडेवारी
बरे झालेली रुग्णसंख्या : ३ लाख ३७ हजार ३५२
उपचार सुरू असलेले रुग्ण :३ हजार ६४१
पोर्टलवरील मृत्यू नोंद : ६ हजार ८८५ एकूण रुग्णसंख्या : ३ लाख ४७ हजार ८७८