दुटप्पी खेळी करणाऱ्या चीन बरोबर सीमावाद लगेच मिटणार नाही कारण…
पूर्व लडाखच्या सीमेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनमध्ये चर्चा सुरु झाली आहे. पण लगेच यातून काही निष्पन्न होणार नाही. दोन्ही देशांमध्ये लगेच कुठला शांतता करार होणार नाही. ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. भारतही त्यासाठी तयार आहे. शनिवारी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेली प्रदीर्घ चर्चा हे त्या दिशेने उचललेले सकारात्मक पाऊल आहे.
चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी भारताने लडाखमधील उंचावरील या युद्ध क्षेत्रामध्ये अतिरिक्त सैन्य तुकडया आणि शस्त्रास्त्र तैनात केली आहेत. एप्रिलच्या मध्यापर्यंत या भागामध्ये नियंत्रण रेषेवर जी स्थिती होती, तीच पूर्ववत करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरु आहेत. शनिवारच्या बैठकीत दोन्ही देशांनी सीमेवर शांतता राखून चर्चेच्या माध्यमातून वादावर तोडगा काढायचं ठरवलं आहे.
स्थानिक पातळावर दोन्ही देशांमध्ये मतभेदांचे वेगवेगळे मुद्दे आहेत. त्यावर एकमत होणे आवश्यक आहे. पूर्व लडाखमधील पँगॉग, गालवान व्हॅली आणि अजून दोन भागांमधून चीनने आपलं सैन्य मागे घ्यावं, फिंगर ४ टू फिंग ८ भागामध्ये बांधलेले बंकर चीनने नष्ट करावेत तसेच चीनने या भागात तैनात केलेले ५ ते ७ हजार सैनिक, तोफा, रणगाडे मागे घेतले पाहिजे या भारताच्या प्रमुख मागण्या आहेत.
चीन प्रत्येकवेळी बोलतो तसं नेहमीच करत नाही. शनिवारी शांततामय मार्गाने तोडगा काढण्याचे ठरवल्यानंतर ग्लोबल टाइम्सने चीनच्या युद्धतयारीचा एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यावरुन चीनचा दुटप्पीपणा लक्षात येतो. यापूर्वी डोकलाम संघर्षाच्यावेळी ग्लोबल टाइम्समधून युद्धाचे इशारे देण्यात येत होते. आताही तेच सुरु आहे. ग्लोबल टाइम्स हे चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचे वर्तमानपत्र आहे.