दुचाकीवरील तरुणाला धमकावून तीन भामट्यांनी दुचाकी आणि मोबाईल लांबविला
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – दुचाकीवर आलेल्या तीन भामट्यांनी एकाला रस्त्यात अडवून त्याची दुचाकी आणि मोबाईल जबरदस्तीने घेऊन गेल्याने दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार दिघी जकातनाक्याजवळ शनिवारी (दि. 15) सायंकाळी सहाच्या सुमारास घडला.
याप्रकरणी शुभम सुरेशराव देशमुख (वय 22, अदवेद बंगला, गजानन महाराजनगर, तालेरा गोडाऊनमागे दिघी) यांनी तक्रार केली आहे. तीन व्यक्तींच्या विरोधात पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दिघी जकात नाका येथील पुणे-आळंदी रस्त्याने दुचाकीवर (एमएच 14, एचएफ 1474) जात होता. त्यावेळी तीन तरुणांनी त्यांना रस्त्यात अडवून आमच्या अंगावर गाडी घालतो काय म्हणून त्याच्याशी वाद काढला. नुकसान भरपाई दे नाहीतर पोलीस चौकीला चल म्हणून दम भरला. धमकावून त्याच्याजवळील दुचाकी आणि मोबाईल असा एकूण 58 हजार 500 रुपयांचे साहित्य पसार केले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.