“दिल्ली जळत असताना,आक्रोश करत असताना गृहमंत्री अमित शहा कुठे होते?”-सामनातून सवाल…
दिल्ली | महाईन्यूज |
दिल्ली हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. ‘दिल्ली जळत असताना, आक्रोश करत असताना गृहमंत्री अमित शहा कुठे होते? काय करीत होते?, असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
दिल्लीच्या दंगलीत आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. केंद्रात काँग्रेस अथवा अन्य आघाडीचे सरकार असते आणि विरोधी बाकांवर भाजपचे महामंडळ असते. तर दंगलीबद्दल गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला असता, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत मोर्चे निघाले असते. राष्ट्रपती भवनावर धडक दिली असती. गृहमंत्री अपयशी ठरल्याचे खापर फोडून राजीनामा हवाच असा आग्रह धरला असता पण आता तसे होणार नाही. कारण केंद्रात भाजपची सत्ता आहे. विरोधी पक्ष कमजोर आहे. तरीही सोनिया गांधी यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला, असे सामनात म्हटलं आहे.