दिल्लीतील आंदोलनातून परतल्यानंतर पंजाबमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या एका शेतकऱ्याने पंजाबला परतल्यानंतर आत्महत्या केली आहे. मृत 22 वर्षीय शेतकऱ्याचे नाव गुरलाभ सिंग असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 18 डिसेंबरला हा शेतकरी दिल्लीतील आंदोलनातून पंजाबला आपल्या घरी आला होता. तो बठिंडा जिल्ह्यातील दयालपुरा मिर्जा या गावातील रहिवासी होता. गुरलाभने शनिवारी (19 डिसेंबर) विषारी पदार्थ खाऊन आपली जीवनयात्रा संपवली. विष खाल्ल्यानंतर त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गुरलाभवर 6 लाख रुपयांचे कर्ज असल्याचे कळते आहे. परंतु त्याच्या आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप समजलेले नाही.
दरम्यान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासह देशभरातील हजारो शेतकरी 26 नोव्हेंबरपासून राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. शेतकरी मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांचा विरोध करत आहेत. हे कायदे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहेत, असा आरोप शेतकरी आंदोलक करत आहेत. या शेतकरी आंदोलनाचा आज 26वा दिवस आहे.