दिल्लीकरांनी भाजपला त्यांची जागा दाखवून दिली : नवाब मलिक
मुंबई | दिल्ली विधानसभा निवडणूकीत जनतेने पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांना साथ दिली आहे. ७० जागांसाठी झालेल्या या निवडणूकीत आम आदमी पार्टी ५८ जागांवर आघाडीवर आहे तर भाजप फफ्त १२ जागांवर आघाडीवर आहे. दिल्लीच्या या निकालावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
‘देशद्रोह्यांना मतदान करु नका असे मोदी म्हणाले होते. दिल्लीकरांनी मोदींनी सांगितलेले ऐकलं आणि देशद्रोही भाजपला नाकारलं.’, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी ही प्रतिक्रिया दिली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत हजारो कोटी वाटूनही भाजपला विजय मिळवता आला नाही, असे नवाब मलिक यांनी सांगितले. दिल्लीतील जनेतेने भाजपला जागा दाखवून दिली. भाजपने दिल्लीत धार्मिक तेढ निर्माण केली. शाहीनबाग प्रकरणी देशद्रोही ठरवलं.
भाजपचे ‘चाणक्य’ अमित शाहांच्या दिल्लीत ४० सभा झाल्या. २७० खासदार, आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत प्रचार केला. हजारो कोटी खर्च केले तरी सुध्दा भाजपचा पराभव झाला असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.