भारताची स्थिती ‘जगाच्या’ तुलनेने ‘अधिक’ चांगली- आरोग्य मंत्रालय
नवी दिल्ली | भारतातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या आणि या साथीच्या आजारामुळे झालेल्या मृत्यूची संख्या पाहता भारतील स्थिती जगाच्या इतर सर्वाधिक फटका बसलेल्या मोठ्या लोकसंख्येच्या देशांच्या तुलनेत चांगली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. भारताशी तुलना केल्यास मोठ्या लोकसंख्येच्या २० करोनाग्रस्त देशांतील रुग्णांची संख्या भारताच्या ८४ पट, तर मृत्यू पावलेल्यांची संख्या २०० टक्के आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
करोनावर उपचार करताना प्लाझ्मा थेरपीच्या सफलतेचा कोणताही पुरावा नसल्याचे महत्त्वपूर्ण विधान लव अग्रवाल यांनी केले आहे. सध्या प्लाझ्मा थेरपीबाबत प्रयोग सुरू आहेत, आणि आयसीएमआर याबाबतची अधिक माहिती मिळवण्याच्या दृष्टीने प्रयोग करत आहे, असे लव अग्रवाल पुढे म्हणाले. परवानगी नसेल तर कुणीही प्लाझ्मा थेरपीचा उपयोग करू नये असेही ते म्हणाले. कारण तसे करणे हे रुग्णांसाठी धोकादायकही ठरू शकते आणि ते बेकायदेशीरही आहे, असेही अग्रवाल पुढे म्हणाले.