दहशतवादाशी लढण्याची लक्ष्यभेद ही नवी पद्धत
पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
नियंत्रण रेषेपलीकडे केलेल्या लक्ष्यभेदातून भारताने दहशतवादाला हाताळण्याचे नवे धोरण आणि पद्धत जगाला दाखवून दिली, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.
जम्मू-काश्मीरमध्ये सुमारे सात हजार कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केल्यानंतर मोदींनी देशभरातील विद्यार्थ्यांशी एका कार्यक्रमात संवाद साधला. सरकार जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा कणा मोडून काढेल, असा निर्धार व्यक्त करून मोदी म्हणले, ‘सरकार प्रत्येक दहशतवाद्याला जशास तसे उत्तर देईल, अशी हमी मी जम्मू-काश्मीरसह देशातील तरुणांना देतो.’
दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या नझीर अहमद वणी आणि औरंगजेब यांना आदरांजली वाहताना मोदी म्हणाले, ‘स्वप्ने साकार करण्यासाठी जे जगतात तेच खरे नायक असतात आणि जे इतरांची स्वप्ने चिरडून टाकतात ते भ्याड असतात.’ निष्पाप आणि नि:शस्त्र काश्मिरी तरुणांच्या हत्या केल्या जात असल्याने संपूर्ण देश संताप व्यक्त करीत आहे. या तरुणांना स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जगायचे होते, परंतु दहशतवाद्यांनी त्यांना लक्ष्य केले. सरकार दहशतवाद्यांशी शक्तीनिशी लढेल, अशी ग्वाही मोदी यांनी दिली.