दसर्याच्या शुभमुहूर्तावर येणार ‘सुखी माणसाचा सदरा’
मुंबई – आपण नेहेमीच ऐकतो सुखी माणसाचा सदरा हा प्रत्येकालाच हवा असतो पण तो दुर्मिळ नाही, प्रत्येक माणूस तो त्याच्याकडे असलेल्या धाग्यांमधून विणू शकतो.. आणि हेच गमक आचारणात आणून आपलं आयुष्य जगणारे चिमणराव आणि त्यांचं सुखी कुटुंब येत आहे दसर्याच्या शुभमुहूर्तावर कलर्स मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. केदार शिंदे (स्वामी क्रिएशन्स) निर्मित आणि दिग्दर्शित ‘सुखी माणसाचा सदरा’ २५ ऑक्टोबर रात्री ९.३० वा. आणि २६ ऑक्टोबरपासून सोम ते शनि रात्री ९.३० वाजता पाहता येईल. केदार शिंदे या मालिकेद्वारे छोट्या पड्यावर पुनरागमन करणार असून महाराष्ट्राचा लाडका अभिनेता म्हणजेच भरत जाधव मालिकेत चिमणच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, श्रुजा प्रभुदेसाई, विजय पटवर्धन हे कलाकार मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत आहेत.
नात्यांचे बंध, एकत्र कुटुंब, आपल्या माणसांवरील प्रेम, हे सध्या कुठेतरी हरवत चाललं आहे… प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात आहे. जे त्याच्याकडे नाहीये वा जे दुसर्याकडे आहे ते मिळवण्याच्या मागे धावतो आहे… पण याविरुध्द चिमणराव आणि त्यांची बायको कावेरी आणि त्यांचा संपूर्ण परिवार आहे जे त्यांच्या कुटुंबासोबत, एकमेकांच्या आनंदात आणि त्यांच्याकडे जे आहे त्यामध्ये सुखी आहेत… चिमण आणि त्याच्या कुटुंबाकडे रूढार्थाने सगळी सुखं नाहीये पण त्यांनी तो आनंद, सुख एकमेकांमध्ये शोधलं आहे… आणि म्हणूनच कुठल्याही संकंटावर ते हसतहसत मात करतात, वेळेला एकमेकांना आधाराचा हात देतात, वेळ पडली तर कानउघडणी करतात. संस्कार आणि नीतीमूल्य त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाची आहेत. त्यामुळेच जे या कुटुंबाकडे बघतात त्यांना ती गोष्ट हवी आहे जी चिमणरावांकडे आहे आणि ती म्हणजे’ सुखी माणसाचा सदरा’.
कार्यक्रमाविषयी बोलताना मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, ‘सुखी माणसाचा सदरा नेहेमीच सगळ्यांना हवाहवासा वाटतो… आपल्याला नेहेमीच असं वाटतं समोरचा माणूस खूप सुखी आहे पण सुख आपल्यातच दडलेलं असतं. मी खूप वर्षांपूर्वी एक मालिका केली होती त्या मालिकेतील कुटुंब प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस पडलं होतं. ब-याच काळानंतर जेव्हा मालिका करायचं ठरवलं तेंव्हा मी एकत्र कुटुंब पध्दती, त्यांच्या छोट्या छोट्या सुखाच्या गोष्टी, दु:ख पचवण्याच्या क्रिया किंवा त्यांचे आनंद ज्याची कुठेतरी टेलिव्हीजनवर कमतरता भासते आहे ते दाखविण्याचा निर्णय घेतला. सर्वसामान्य माणसाला टेलिव्हीजन हे एक त्यांच्या घरातलं प्रतिनिधी वाटू लागलं आहे हे मात्र खरं… आपल्याच घरातला प्रतिंनिधी अत्यंत चुकीच्या पध्दीतीने जर वागत असेल तर बाकीच्या मंडळींवर देखील तेवढाच परिणाम होईल यावर मी बराच काळ विचार करत होतो… कलर्स मराठीद्वारे लॉकडाउन मध्ये मी जी एक गोष्ट लिहिली तिला दाखविण्याची संधी मिळाली. ती गोष्ट म्हणजे ‘सुखी माणसाचा सदरा’…म्हणजे रसिक प्रेक्षकांच्या घरातला आरसा आहे आणि त्यांचं प्रतिबिंब त्यांना या मालिकेत बघता येईल अशी मालिका निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत ”.
‘मी आणि भरत जाधव जेव्हा जेव्हा एकत्र आलो आहोत तेव्हा लोकांना अत्यंत आनंद झाला आहे आणि तो आनंद देण्याचं कर्तव्य आणि जबाबदारी आमचीच आहे. भरत जाधव एक उत्तम अष्टपैलू अभिनेता आहे. चिमणसाठी भरतशिवाय इतर कुणाचा विचारही डोकावला नाही..इतका भरत चिमणमय झाल्याचा अनुभव आपणा सगळ्यांना येईल अशी माझी खात्री आहे.”