तुफानी पावसाने बांगला देशातील भूस्खलनात 12 जणांचा मृत्यू
ढाका (बांगला देश) – बांगला देशातील तुफानी पावसाने झालेल्या भूस्खलनात 12 जण मरण पावले आहेत. मरणारांमध्ये दोन रोहिंग्यांचा समावेश आहे. पीडित लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत असल्याची माहिती सरकारने दिली आहे. गेले तीन दिवस सतत चालू असलेल्या पावसाने कॉक्स बाजार आणि रंगामती जिल्ह्यात या दुर्घटना घडल्या आहेत. हे दोन्ही जिल्हे म्यान्मार सीमेला लागून आहेत. आणि म्यान्मारहून आलेले रोहिंग्या शरणार्थी या भागात मोठ्या संख्येने राहत आहेत.
गेल्या आठवडाभरातील मुसळधार पावसाने रोहिंग्या शरणार्थी राहत असलेले 1500 पेक्षा अधिक तंबू नष्ट झाल्याची माहिती बांगला देश शरणार्थी सहाय्य आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. येत्या 24 तासात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून आणखी भूस्खलन होण्याची शक्यता असल्याचे सांग़ितले आहे.
आंतरराष्ट्रीय मदतकार्य संस्थांच्या सहाय्याने बांगला देश सरकार 1 लाख रोहिंग्या शरणार्थींना या छावण्यांमधून सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न करत असल्याचे एका वरिष्ठ प्रशासनिक अधिकाऱ्याने सांगितले.