breaking-newsराष्ट्रिय
तातडीच्या सुनावणीबाबत निकष निश्चीत करणार
- नवीन सरन्यायाधिशांचे प्रतिपादन
नवी दिल्ली– तातडीच्या सुनावणीच्या संबंधात काही निकष लवकरच निश्चीत केले जातील तो पर्यंत कोणताही विषय तातडीच्या सुनावणीखाली विचारार्थ घेतला जाणार नाही असे भारताच्या नवीन सरन्यायाधिशांनी स्पष्ट केले आहे.
नवे सरन्यायाधिश रंजन गोगोई यांनी आज आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली त्यानंतर बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले तातडीच्या सुनावणीच्या संबंधातील निकष आम्ही लवकरच निश्चीत करू.
काही बाबींच्या तातडीच्या सुनावणीची गरज त्या विषयाच्या स्वरूपावरून लगेच लक्षात येते. एखाद्याला उद्याच फाशी दिली जाणार असेल तर त्याच्या विषयीचे प्रकरण तातडीने सुनावणीसाठी घेण्याची गरज आहे हे वेगळे नमूद करण्याची गरज नाही. पण त्या खेरीजच्या विषयाची तातडी कशी निश्चीत करायची याचे काही निकष ठरवले गेले पाहिजेत असे ते म्हणाले.
दरम्यान आज राष्ट्रपती भवनात झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात न्या रंजन गोगोई यांना भारताच्या सरन्यायाधिश पदाची शपथ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली. राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉल मध्ये हा कार्यक्रम झाला. 63 वर्षीय रंजन गोगोई हे भारताचे 46 वे सरन्यायाधिश ठरले आहेत. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, देवेगौडा यांच्या सह अनेक नेते आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते