डॉक्टरांनी भितीपोटी दवाखाने बंद ठेवणे चूकीचे,त्यांना देव मानलं जातं- राजेश टोपे
राज्यातील डॉक्टरांनी भितीपोटी दवाखाने बंद ठेवणे हे चूकीचे आहे. डॉक्टरांकडे आदर्श म्हणून पाहिलं जातं त्यांना देव मानलं जातं. त्यामुळे डॉक्टरांनी दवाखाने बंद न ठेवता रुग्णांवर उपचार करावे, अशी विनंती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. या महासंकाटाच्या काळात कोणीही असंवेदनशीलता दाखवू नका, असे त्यांनी सर्वांना सांगितलं आहे.
राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा १३५ वर पोहचला आहे. आतापर्यंत १९ कोरोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. कोरोना बरा होतोय ही आशादायी बाब आहे. प्रतिकारशक्ती आणि योग्य उपचाराने हा आजार बरा होऊ शकतो, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. तसंच, राज्यात रक्ताचा तुटवडा आहे. फक्त ७ ते ८ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. त्यामुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. फक्त रक्तदान करताना गर्दी करु नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा, असे आवाहन त्यांनी केले.
डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्कचा तुटवडा होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. पीपीई आणि एन -९५ मास्क दिले जात आहेत. पण कोरोना रुग्ण किंवा संशयितांना उपचार करताना डॉक्टरांनी त्याचा आग्रह टाळावा, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. आरोग्य कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. तसंच त्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याचा विचार सुरु असल्याचे देखील त्यांनी सांगितले.