#CoronaVirus: दशक्रिया विधी किंवा अस्थी विसर्जन नंतर करणही शक्य- दाते पंचागकर्ते
कोरोना विषाणूमुळे सर्वांनाच अडचणीला सामोरे जावे लागत आहे. केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर निर्बंध आले आहेत. नागरिकांना आता धार्मिक समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. देशभरातील देवस्थाने यापूर्वीच बंद करण्यात आली आहेत. लॉकडाऊनमुळे काहींना दशक्रिया विधी किंवा अस्थी विसर्जनालाही अडचणी येत आहेत. अनेकांना या काळात हे विधी कसे पार पाडावेत असा प्रश्न पडला आहे. परंतु, दाते पंचागकर्ते यांनी यावर नागरिकांना सल्ला दिला आहे.
कोरोना विषाणूचे वातावरण निवळल्यावर चार दिवस सवडीचे काढून १० ते १४ दिवसांचे कर्म अंतरीत म्हणून करता येते, हे धर्मशास्त्रास संमत आहे. मंत्राग्नि झालेला नसेल तर सर्व अस्थी विसर्जन कराव्यात आणि पुढे अंत्यकर्म करताना आधी पालाश विधी करुन, मग नवव्या पर्यंतचे विधी करावेत आणि त्याच दिवशी दहाव्याचे कर्म करावे. घरातील दिवा ११ व्या दिवशी विसर्जित करावा. तसेच सुतक ११ व्या दिवशी संपते. त्यामुळे इतर सर्व व्यवहार, घरातील पूजा सुतक संपल्यामुळे करता येईल.
तसेच प्रथम वर्ष श्राद्ध किंवा दरवर्षीचे श्राद्धसुद्धा जर त्या तिथीला करणे जमले नाही. तर वातावरण निवळल्यावर अष्टमी किंवा व्यतिपात किंवा अमावस्या यापैकी कोणत्याही एका दिवशी अंतरीत प्रथमवर्ष श्राद्ध किंवा दर वर्षीचे श्राद्ध करावे, असे अंतरीत श्राद्ध करणे धर्मशास्त्र संमत आहे पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले आहे. त्यामुळे धामिर्क संकटात सापडलेल्या लोकांना नक्कीच दिलासा मिळाला असेल…