breaking-newsमुंबई

टॅक्सी भाडेवाढीचा निर्णय शासनाच्या हाती

  • ग्राहक पंचायत, मुंबई टॅक्सी संघटना भूमिकेवर ठाम

टॅक्सीचे भाडे २५ रुपये करा, अशी मागणी पुन्हा एकदा परिवहन विभागात झालेल्या बैठकीत मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने केली आहे. तर सध्याच्या स्पर्धात्मक परिस्थितीत टॅक्सीची भाडेवाढ नको, अशी भूमिका मुंबई ग्राहक पंचायतीने घेतली. त्यामुळे भाडेवाढ करावी की नाही, हा निर्णय परिवहन विभागाच्या हाती असणार आहे. यासंदर्भात लवकरच  निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेल्या तीन वर्षांत टॅक्सीचालकांना भाडेवाढ मिळालेली नाही. त्यामुळे सध्या २२ रुपये असलेले भाडे तीन रुपयांनी वाढवून २५ रुपये करावे, अशी मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने केली आहे. मात्र ही भाडेवाढ लागू केल्यास भाडे रचना ठरवण्यासाठी नेमलेल्या खटुआ समितीच्या शिफारशीतील प्रवासी सवलतींना टॅक्सी संघटनांनी विरोध केला आहे. प्रवासी सवलती दिल्यास चालकांचे उत्पन्न जाईल आणि त्यामुळे सवलती नको, असे लेखी परिवहन विभागाला दिले आहे. मुंबई ग्राहक पंचायतीने मात्र भाडेवाढ केल्यास याचा विपरीत परिणाम टॅक्सी व्यवसाय आणि ग्राहकांवर होऊ शकतो. त्यामुळे सध्याच्या स्पर्धात्मक परिस्थितीत टॅक्सीची भाडेवाढ हा त्यावर उपाय होऊ शकत नाही. भाडेवाढ केल्यास समितीच्या शिफारशींनुसार असलेल्या पुढील आठ किलोमीटरच्या प्रवासात १५ ते २० टक्के प्रवास सवलत आणि दुपारी १२ ते सायंकाळी ४ वेळेत १५ टक्के प्रवास सवलत लागू कराव्यात, असे स्पष्ट कळवले आहे. गेल्या शुक्रवारी परिवहन विभागासोबत बैठक झाली. त्यावेळी टॅक्सी संघटना व ग्राहक पंचायत आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. बैठकीला प्रधान सचिव (परिवहन विभाग) आशीष कुमार सिंह, परिवहन आयुक्त शेखर चन्नो उपस्थित होते. त्यांनी लवकरच भाडेदरासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.

भाडेदरासंदर्भात म्हणणे लेखी दिल्यानंतर शुक्रवारी परिवहन विभागाबरोबर पुन्हा बैठक झाली. आम्ही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष शिरीष देशपांडे व मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए.एल.क्वाड्रोस यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button