ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांचं निधन
पुणे : आपल्या साहित्यातून उपेक्षित आणि ग्रामीण जीवन मांडणारे ज्येष्ठ साहित्यकार झुलवाकार उत्तम बंडू तुपे यांचे आज पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. उत्तम बंडू तुपे त्यांच्या अतिशय गाजलेल्या ‘झुलवा’ कादंबरीमुळे झुलवाकार म्हणून ओळखले जात .शिवाय त्यांच्या इतरही अनेक कादंबऱ्यांना पुरस्कार मिळालेआहेत . ‘आंदण’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला होता. ‘काट्यावरची पोटं ‘ या आत्मकथेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमय पुरस्कार मिळाला होता.झुलवा कादंबरीलाही राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. खुळी, कळा, कळाशी, नाक्षारी ,भसम, चिपाड, इंजाल, झावळ, माती आणि माणसं या कादंबऱ्याही त्यांच्या विशेष गाजल्या होत्या.
ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांनी त्यांच्या ‘झुलवा’कादंबरीवर साकारलेल्या नाटकात अभिनेते सयाजी शिंदे आणि सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी भूमिका केल्या होत्या.या दोघांचा अभिनयाचा प्रवास येथूनच सुरु झाल्याचे बोलले जाते.