ज्यांना मूग-मसूरमधला फरक कळत नाही ते शेती शिकवत आहेत : नरेंद्र मोदी
राजस्थानच्या निवडणूक प्रचाराने आता वेग घेतला असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागौरी येथील प्रचार सभेत काँग्रेसवर कडाडून शाब्दिक हल्ले चढवले. यावेळी सभेतील शेतकऱ्यांना संबोधित करताना त्यांनी नामदार आणि कामदार या मुद्द्यावर भाषण केले. ज्यांना हरभऱ्याच रोप असतं की झाड हे कळत नाही. तसेच ज्यांना मूग आणि मसूर या डाळींमधील फरक कळत नाही ते आज देशाला शेती कशी करायची हे शिकवत आहेत, असा टोला त्यांनी काँग्रेसवाल्यांना लागावला.
मोदी म्हणाले, मी तुमच्यापैकीच एक आहे. आपण जे जीवन जगलात तेच मी ही जगलो आहे. आपण सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला नाहीत की मी ही आलेलो नाही. त्यामुळे मी तुमच्यातलाच एक आहे. आम्ही जनतेकडे आमच्या मुलाबाळांच्या भल्यासाठी मतं मागत नाही आहोत. तर इथल्या लोकांची स्वप्ने साकार करण्यासाठी या जमिनीचे भले करण्यासाठी मतं मागत आहोत.
आमच्या सरकारमुळे देशातील सव्वाशे कोटी लोकांना घरे मिळाली आहेत. तसेच २०२२पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार आहे. आजची लढाई ही नामदार आणि कामदार यांच्यामधली लढाई आहे. चुलीतला धूर काय असतो हे नामदारांना माहिती नाही, लाकडाची चूल कशी पेटती हे त्यांना माहिती नाही. मी माझ्या लहानपणी आपल्या आईकडून लाकडाच्या चुलीवर जेवण बनवताना पाहिलं आहे. धुरामुळे आईच्या डोळ्यातून कसं पाणी यायचं हे मी पाहिलं आहे. यातूनच मला उज्ज्वला योजनेची प्रेरणा मिळाली, असे मोदी यावेळी शेतकऱ्यांना आवाहन करताना म्हणाले.