‘जेएनयू’च्या निवडणुका ‘ईव्हीएम’वर होत नसल्यानेच भाजप कायम पराभूत – शिवसेना
पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या भाजपने संबंध देशात सत्ता मिळवली असली तरी त्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठावर झेंडा फडकवता आलेला नाही. या विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा नेहमीच दारुण पराभव होताना दिसतो आहे. हा पराभव सततचा आहे. त्यामुळे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील मतदान ‘ईव्हीएम’द्वारे होत नसल्याने तेथील विजय मिळवणे अवघड झाले आहे काय? असा खोचक प्रश्न ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपाला विचारण्यात आला आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, ”कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा आरोप ठेवल्यामुळे काही चळवळे वळवळू लागले आहेत. हे सर्व प्रकरण दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आहे. फेबुवारी २०१६ मध्ये या विद्यापीठाच्या प्रांगणात संसदेवरील हल्लाप्रकरणी अफझल गुरूला फाशी दिल्याच्या विरोधात निषेध सभा घेण्यात आली होती. त्यात अफझल गुरूच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या गेल्या. तो दिवस गुरूचा स्मृतिदिवस म्हणून पाळला गेला. हे सर्व देशद्रोही कृत्य असल्याने कन्हैया कुमार, उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य व इतर १० जणांवर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. या सगळय़ांना नंतर अटक झाली व आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे असल्याचे पोलीस सांगतात. जर हे पुरावे पक्के असतील तर कन्हैया कुमारच्या बाजूने उभ्या राहिलेल्या प्रत्येकाचेच थोबाड फुटले पाहिजे. बाराशे पानांचे आरोपपत्र आहे व त्यात अनेक देशविरोधी घोषणा, भाषणांचा समावेश आहे. ‘भारत तेरे तुकडे होंगे, इन्शाल्ला, इन्शाल्ला’, ‘कश्मीर की आझादी तक जंग रहेगी’ किंवा ‘भारत मुल्क को एक झटका और दो’ अशा घोषणा उन्मत्तपणे दिल्या गेल्या व त्याचे चित्रीकरण झाले आहे. हिंदुस्थानी सैन्याविरोधातही घोषणा देण्यात आल्या. त्याचे तीव्र पडसाद देशात उमटले.