जुलै महिन्यात देशात तब्बल ५० लाख नोकरदारांना आपली नोकरी गमवावी लागली आहे
कोरोना रोखण्यासाठी लागू केलेल्या कठोर लॉकडाउननंतर अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असली नोकरदारांसाठी मात्र अजूनही मनात भीती आहे. कोरोनापाठोपाठ महामंदी येणार हे जुलैमधील बेरोजगारीच्या आकडेवारीने स्पष्ट झालं आहे. कोरोनाची साथ रोखण्यासाठी देशात जवळपास अडीच महिने लागू केलेल्या दीर्घकालीन लॉकडाउनने जवळपास १२ कोटींहून अधिक कामगारांना देशोधडीला लावले. बेरोजगारीचे सत्र काही केल्या थांबत नसल्याचे दिसून आले आहे. जुलै महिन्यातील ताज्या आकडेवारीने नोकरदारांच्या मनात धडकी भरवली असून सरकारची झोप उडवली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेच्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात देशात तब्बल ५० लाख नोकरदारांना आपली नोकरी गमवावी लागली आहे.
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र सरकारने करोना रोखण्यासाठी देशव्यापी टाळेबंदी घोषित केली होती. या टाळेबंदीत उद्योग धंदे पूर्णतः बंद होते. औद्योगिक वसाहती ओस पडल्या. उत्पादन चक्र थांबलं. संघटीत आणि असंघटीत क्षेत्रातील कामगारांची परवड झाली. लाखो कामगार विविध राज्यांमध्ये अडकून पडले. हातची नोकरी गेली आणि दोनवेळच्या खाण्याचे हजारो कामगारांचे हाल झाले होते. जूनपासून सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरु केली. टप्प्याटप्य्याने अर्थव्यवस्थेतील प्रमुख घटकांना दैनंदिन कामे सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर रोजगारांच्या संधी देखील वाढल्याचे दिसून आले होते. मात्र जुलैमध्ये पुन्हा एकदा बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याने सरकारच्या चिंतेत भर पडली आहे.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात १ कोटी ७७ लाख नोकऱ्या गेल्या होत्या. मे महिन्यात एक लाख नोकरदार बेरोजगार झाले. तर जूनमध्ये ३९ लाख नव्या नोकऱ्या निर्माण झाल्याचे दिसून आले. तर जुलैमध्ये पुन्हा एकदा ५० लाख नोकऱ्या गेल्याने खळबळ उडाली आहे. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ने म्हटलं आहे की टाळेबंदीमधील बेरोजगारीचे हे आकडे भयावह आणि भीषण परिस्थितीचे जाणीव करून देणारे आहेत. ज्यांच्या नोकऱ्या गेलय आहेत किंवा ज्यांची रोजीरोटी बुडाली आहेत हे सर्व समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील आहेत. असंघटीत क्षेत्रापाठोपाठ आता कॉर्पोरेट आणि स्टार्टअप , छोटे मोठे उद्योग यांनीही नोकर कपातीचा सपाटा लावला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात बेरोजगारी आणखी शक्यता आहे. नोकरी गमावणारे वाढले असून नोकरी शोधणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. कोरोनाच्या संकटात नोकरदार वर्ग सर्वाधिक भरडला गेला आहे, असे निरीक्षण सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने नोंदवले आहे. मार्चमध्ये लॉकडाउन लागू झाल्यापासून नोकरदार वर्गातील १ कोटी ८९ लाख बेरोजगार झाले आहेत, असे या अहवालात म्हटलं आहे.