जलतरण तलाव पालिकाच चालविणार?
- चाचपणी सुरू
- पिंपरी-चिंचवड पॅटर्न पुण्यातही शक्य
पुणे – प्रशासनाकडे यंत्रणा नसल्याने महापालिकेचे जलतरण तलाव ठेकेदारांतर्फे चालविले जातात. मात्र, ठेकेदाराकडून नियमावली पायदळी तुडवत नागरिकांच्या जीवाशी खेळले जात आहे. त्यामुळे दरवर्षी एक ते दोन नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे हे तलाव महापालिकेनेच चालविल्यास अशा दुर्घटना रोखणे तसेच चांगली सुरक्षा देत नागरिकांना रास्त दारात ही सेवा उपलब्ध करून देणे शक्य होईल का, याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
पिंपरी- चिंचवड महापालिकेकडून स्वतः जलतरण तलाव चालविले जातात. त्याच धर्तीवर पुण्यातही हे प्रकल्प राबविण्याबाबत विचार सुरू आहे. महापालिने विविध भागात 31 जलतरण तलाव बांधले आहेत. त्यातील 10 बंद आहेत. त्यातील तळजाई क्रीडा संकुलातील तलावात मागील महिन्यात दत्तवाडी येथील 21 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला. यानंतर पालिकेने तलावांचे सुरक्षा ऑडिट केले असता, 21 पैकी फक्त 4 तलाव पोहण्यासाठी सुरक्षित असल्याची बाब समोर आली होती. तर 9 तलाव सर्वसाधारण सुरक्षित आणि 7 तलाव पूर्णतः असुरक्षित असल्याचे समोर आले. त्यामुळे हे 7 तलाव बंद केले आहेत. मात्र, या सर्व तलावामध्ये भविष्यात पुरेशी सुरक्षा साधने दिली, तरी मर्यादेपेक्षा जास्त प्रवेश देणे तसेच तलाव केवळ आपले गुंतविले पैसे परत मिळविण्याचे साधन बनले असल्याने प्रशासनकडून ते स्वतः चालविले जाण्याची शक्यता आहे.
असे आहे आर्थिक गणित
पिंपरी- चिंचवड महापालिकेकडून त्यांनी बांधलेले जलतरण व्यवस्थापन पालिकाच सांभाळते. मात्र, हे तलाव फायद्यात नसल्याचे समोर आले आहे. त्याचे व्यवस्थापन, नागरिकासाठीचे दर आणि मोठ्या प्रमाणात कर्मचारी, सुरक्षा रक्षक, प्रशिक्षक, लाईफगार्ड यांच्या नेमणुकीचा खर्च मोठा आहे. त्यामुळे महापालिकेस दरवर्षी मोठा खर्च करावा लागतो. तर दुसरीकडे पुणे महापालिकेस हे तलाव ठेकेदारांना चालविण्यासाठी दिल्याने लाखो रुपयांचे भाडे मिळते. तसेच तलावाच्या फक्त देखभाल दुरुस्तीचा खर्च करावा लागतो. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर मात्र, पालिकेस तोटा होणार नाही. तसेच जीवितहानी होणार नाही, अशा पद्धतीने हे तलाव महापालिकेडूनच चालविता येतील का, याची तपासणी प्रशासनाकडून सुरू आहे.