‘जनआशिर्वाद’ अन्ं ‘महाजनादेश’ यात्रेची तुलना छत्रपतींच्या ‘शिवस्वराज्य’शी होवू शकत नाही – खासदार डाॅ. अमोल कोल्हे
- राज्याला पुर्णवेळ गृहमंत्री न मिळाल्याने गुन्हेगारी वाढली
- लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानावरुन ‘शिवस्वराज्य’ यात्रेला प्रारंभ
पिंपरी ( महा ई न्यूज ) – राज्यात एका पक्षाकडून मुख्यमंत्री पद मिळावे म्हणून ‘जनआशिर्वाद’ यात्रा काढलीय, तर दुसरीकडे ‘मी पुन्हा येईन’ म्हणत ‘महाजनादेश’ यात्रेचा प्रारंभ होत आहे. परंतू, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाच्या रयतेचं राज्य यावं, याकरिता एक मावळा म्हणून ही ‘शिवस्वराज्य’ यात्रा काढणार असून ही यात्रा लोकांचा आवाज ठरेल, असे उद्गगार खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी पिंपरीत काढले. दरम्यान, शिवसेना आणि भाजप पक्षाकडून मुख्यमंत्री पदासाठी दोन्ही यात्रा काढल्याची टिका कोल्हे यांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांचा आज (गुरुवारी) त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर डाॅ. कोल्हे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक अजित गव्हाणे, भाऊसाहेब भोईर, मंगला कदम, वैशाली काळभोर, आदी मान्यवर उपस्थित होते.
डाॅ. कोल्हे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडसह संपुर्ण राज्यात आणि विशेषता मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. त्याची आकडेवारी बोलकी आहे. परंतु, पाच वर्षे राज्याला स्वतंत्र गृहमंत्री दिला नाही. ते पद मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडेच ठेवले. राज्यातील वाढती गुन्हेगारी बघता हे सत्तेच्या मस्तीचे प्रतिक तर नाही ना, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
गुन्हेगारीबरोबरच सध्या राष्ट्रवादीतून बड्य़ा नेत्यांच्या होत असलेल्या पक्षांतरावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, पक्षांतर करून गेलेल्या लोकांबद्दल वाईट बोलू नये. परंतु, सध्या राष्ट्रवादीसाठी हा परिवर्तनाचा काळ आहे. शरद पवार यांनी अनेक नेतृत्वांना उभे केले. नव्या चेह-यांना संधी मिळणार असल्याने हा पक्षासाठी नक्कीच सकारात्मक बदलाचा काळ ठरणार आहे. नेते, पदाधिकारी पक्ष सोडून गेले असले, तरी कार्यकर्त्यांची फळी मजबूत असून त्याच जोरावर विधानसभेला मोठे यश मिळणार आहे. असंही ते म्हणाले.
माजी खासदार आढळराव पाटलांची चुप्पी?
शिरुर लोकसभा मतदारसंघात लोकांनी परिवर्तन घडविले आहे. मागील पंधरा वर्षात काय झाले, कोणते प्रश्न सुटले, हे त्यांना विचारा, परंतू, पुर्वीच्या खासदारांनी मतदारसंघातील प्रश्नांवर तिस-या अधिवेशनात बोलले. पण, मी पहिल्यांच अधिवेशनात तीन वेळा बोललो, अशी टिपण्णी खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचे नाव न घेता केली आहे. त्यामुळे माजी खासदारांनी कोणत्या प्रश्नांवर संसदेत आवाज उठविला, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.