चैत्यभूमीचे दरवाजे उघडा, भीम आर्मीचे चैत्यभूमीवर आंदोलन
मुंबई | कोरोनाकाळात मागील पाच महिन्यांपासून अभिवादनापासून वंचित असलेल्या चैत्यभूमीचे दरवाजे खुले करावे सोबतच येथील पुस्तक स्टाॅल देखील सुरू करावेत या मागणीसाठी भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेने आज दादर चैत्यभूमीवर आंदोलन केले.
कोरोना संक्रमणामुळे मार्च 2020 पासून देशातील लाखो जनतेची उर्जाभूमी असलेल्या दादरची शिवाजी पार्क चौपाटी येथील चैत्यभूमीचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. दादर चैत्यभूमीवर कोणतेही कर्मकांड केले जात नाही लोक या ठिकाणी अभिवादन करून उर्जा घेऊन जात असतात सोबतच फुले शाहू आंबेडकरी व परिवर्तनवादी पुस्तके घेऊन जात असतात मात्र दररोज चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणा-या जनतेचा दरवाजे बंद करण्यात आल्याने हिरमोड होत आहे.
आज भाद्रपद पौर्णिमेनिमित्त भीम आर्मीने आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी चैत्यभूमीवर महाबुध्दवंदना घेऊन महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
भीम आर्मी भारत एकता मिशनचे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य व माजी महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे तसेच महाराष्ट्र कोअर कमिटी प्रमुख राजू झनके यांच्या नेतृत्वाखाली शांततेत झालेल्या या आंदोलनात भीम आर्मीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रमेश बालेशसह अन्य सदस्य उपस्थित होते.