पूर्व लडाखमधील चीनच्या घुसखोरीला भारताच्या तिबेटी जवानांमुळे बसला आळा!
लडाख | पूर्व लडाखमधील पेंगाँग त्सो सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर घुसखोरी केल्यानंतर आता चिनी सैनिक दक्षिण किनाऱ्यावर घुसखोरी करीत आहेत. 30 ऑगस्टपासून 1 सप्टेंबरपर्यंत तब्बल तीन वेळा चिनी सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय लष्करातील तिबेटीयन तरुणांनी चीनच्या या सैनिकांचा जोरदार मुकाबला करून त्यांना पळवून लावले. त्यामुळे चीनचा प्रचंड जळफळाट झाला आहे.
चीनच्या लष्करी प्रवक्त्याने सांगितले की, “तिबेटी नागरिकांना आश्रय देणाऱ्या भारतासह प्रत्येक देशाचा आम्ही निषेध करतो. आता चीनला तिबेट कडे लक्ष केंद्रित करावे लागेल. भारतात वास्तव्य करणारे निर्वासित तिबेटियन नागरिक आणि भारतीय लष्करामध्ये असलेल्या तिबेटी जवानां मुळे आम्हाला प्रचंड मनस्ताप झाला आहे.
चीनने पेंगाँग त्सो सरोवराचा दक्षिणेकडील किनाऱ्यावर 30 ऑगस्टच्या रात्री चुशुल भागात घुसखोरी केली. 31 ऑगस्टच्या रात्री याच परिसरातील हेलमेट टॉप भागात घुसखोरी केली. काल 1 सप्टेंबरच्या रात्री चेपूजी पोस्ट पासून चिनी सैनिकांनी पुढे येण्याचा प्रयत्न केला. मात्र या चिनी सैनिकांना भारतीय लष्करातील तिबेटी जवानांनी रोखून धरत नंतर पळून लावले. तिबेटी नागरिकांमध्ये चीनच्या विरोधात प्रचंड संताप आणि आक्रोश आहे. त्यामुळे चिनी सैनिकांना बघताच तिबेटी जवानांचे रक्त सळसळायला लागते.
15/16 जूनच्या रात्री झालेल्या संघर्षात तिबेटी जवानच आघाडीवर होते. त्यांनी चिनी सैनिकांना बेदम चोप दिला. भारताच्या शहीद झालेल्या 20 जवानांमध्ये काही तिबेटी जवानांचाही समावेश आहे. दुसरीकडे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की, आम्ही चीनच्या घुसखोरी वर बारीक लक्ष ठेवून आहोत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिेओ यांनी सांगितले की, चीन सतत शेजाऱ्यांची आणि इतर देशांची वाद घालण्याचा प्रयत्न करीत आहे.