चीनच्या हेरगिरीबाबत चौकशीचे आदेश, एक्सपर्ट कमिटी महिनाभरात देणार रिपोर्ट
नवी दिल्ली | भारतामध्ये चीनच्या हेरगिरीबाबत मोठी खळबळजनक माहिती उघड झाली. चीनकडून आता केवळ एलएसीवरच नाही तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील भारताविरोधात कारस्थान रचलं जात आहे. आता चिनी कंपनीच्या भारतात हेरगिरीबाबत सरकारनं चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणात नॅशनल सायबर सेक्युरिटी कोऑर्डिनेशनच्या नेतृत्वात एक एक्सपर्ट कमिटी तयार केली आहे. ही कमिटी 30 दिवसांच्या आता रिपोर्ट सरकारला देणार आहे.
चीनच्या शेनझेन आणि झेन्हुआ इन्फोटेक या कंपनीकडून हेरगिरी होत असल्याचा मुद्दा भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं चीनच्या राजदुतांसमोर मांडला. या चिनी कंपनीकडून भारतातील प्रमुख लोकांची हेरगिरी केली जात असल्याचं प्रकरण समोर आलं आहे.
चीनकडून भारतातील मोठ्या संविधानिक पदांवरील राजकीय नेते तसेच लष्करातील बड्या अधिकाऱ्यांची हेरगिरी सुरु असल्याचं हे प्रकरण आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, प्रमुख विरोधी पक्षनेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश यांच्यासह सुमारे 1350 लोकांची हेरगिरी सुरु असल्याची माहिती आहे. एवढंच नाही तर चीन भारतीय अर्थव्यवस्थेवरही लक्ष ठेवून असल्याची माहिती आहे.
भारतातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपाठोपाठ चीन भारतातील स्टार्टअप अॅप्स आणि ई-कॉमर्स कंपन्यांवरही पाळत ठेवत असून पेमेंट अॅप्स, सप्लाय चैन, डिलीवरी अॅप्स आणि या अॅप्सचे सीईओ-सीएफओसह जवळपास 1400 व्यक्ती आणि संस्थांवर पाळत ठेवून असल्याची माहिती समोर आली आहे.