breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

…म्हणून ममतादीदी भेटल्या, शरद पवारांनी केलं स्पष्ट

मुंबई – महाराष्ट्र दौर्‍यावर आलेल्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. या भेटीनंतर पवार आणि बॅनर्जी यांनी संयुक्तरित्या प्रसारमाध्यांशी संवाद साधला. ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारविरोधात नेतृत्व उभे करण्यासाठी भेट घेतली, असे पवारांनी यावेळी सांगितले.

भेटीनंतर बोलताना शरद पवार म्हणाले की, पश्‍चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे जुने नाते आहे. सध्याचे राजकारण पाहता नेता फिल्डवर राहिला तरच विजयी होऊ शकतो, असे ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करताना लक्षात आले. फिल्डवर राहून काम केल्यामुळेच पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा विजय झाला. त्यामुळे त्यांचा वैयक्तिगत अनुभव त्यांनी सांगितला. आम्ही त्याचे स्वागत करतो. आजच्या भेटीत राष्ट्रीय पातळीवर सर्वांनी एकत्र यावे आणि मोदी सरकारविरोधात नेतृत्व उभे करण्यावर चर्चा झाली. जे लोक भाजपच्या विरोधात आहेत त्या सर्वांनी एकत्र यावे यावर चर्चेचा भर होता.

काँग्रेसला वगळण्याची या बैठकीत चर्चाच झाली नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्यावर चर्चा झाली आहे. त्यासाठी जो मेहनत करेल आणि सर्वांसोबत यायला तयार आहे, त्या सर्वांना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत, असे पवारांनी स्पष्ट केले. तर ममता बॅनर्जी यांनी म्हटले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मी महाराष्ट्रात आले होते. पण ते आजारी असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. पण त्यांनी आपले प्रतिनिधी म्हणून त्यांच्या पक्षाचे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना भेटीसाठी पाठवले. उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी मी प्रार्थना केली. आज ज्या प्रकारे देशात फॅसिझम सुरु आहे त्याविरोधात सक्षम पर्याय निर्माण झाला पाहिजे. पण हे कोणा एकट्याचे काम नाही. जो सक्षम आहे त्याला घेऊन हे करावे लागेल. भाजपविरोधात लढणारा सक्षम पर्याय असायला हवा, कोणी लढायला तयार नाही त्याला आम्ही काय करणार?, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button