राज्यात आणखी तिघांना कोरोना तर,पाच जणांना डिस्चार्ज
राज्यातील कोरोना विषाणूबाधितांच्या संख्येत आणखी तिघांची भर पडली असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचवेळी कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या आणि रुग्णालयात दाखल असलेल्या पाच जणांची प्रकृती आता उत्तम आहे. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
राजेश टोपे म्हणाले, मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई आणि ठाणे येथील कोरोना विषाणू संसर्गित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणी आणखी कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. राज्यात आणखी तिघांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. तीनपैकी प्रत्येकी एक जण पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबईतील आहे. या तिघांची प्रकृती स्थिर आहे. राज्यात कोरोना विषाणूबाधितांची संख्या आता ५२ झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी २२, मार्चला जनता संचारबंदी पाळण्याचे आवाहन केले आहे. सकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले. त्यांच्या आवाहनाचे पालन करावे, असेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे.