चार दिवसांच्यासाठी योगी सरकार करणार ६३ हजार झाडांची कत्तल
राज्य सरकारचा कोणत्याही विकासकामांना विरोध नाही. मात्र, वैभव गमावून विकासकामे केली जाणार नाहीत. दिलेला शब्द पाळणे, हे आपले तत्त्व आहे, असे स्पष्ट करत, ‘आरे’मधील मेट्रो कारशेडच्या वादग्रस्त कामाला स्थगिती दिल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली. या निर्णयाचा पर्यावरण प्रेमींनी स्वागत केले आहे. असं असतानाच दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने चक्क ६३ हजार झाडे कापणार आहे. राज्याची राजधानी असणाऱ्या लखनौमध्ये होणाऱ्या ‘डिफेक्स्पो’ प्रदर्शनासाठी ही वृक्षतोड केली जाणार आहे.
लखनौ हे देशातील अव्वल दहा सर्वाधिक प्रदुषित शहरांपैकी एक आहे. कानपूर आणि लखनौ ही देशातील सर्वाधिक प्रदुषित शहरांपैकी एक असतानाच योगी सरकारने हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. गोमती नदीकाठची ६३ हजार ७९९ झाडे कापण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये येथे ‘डिफेक्स्पो’ प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. याच प्रदर्शनसाठी मोकळी जागा निर्माण करण्याचा दृष्टीने ही वृक्षतोड करण्यात येणार असल्याचे समजते.