ग्रामपंचायत निवडणूक निकाल : पुण्यात मिरवणुका काढण्यास मनाई
पुणे – ग्रामीण भागाच्या राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सोमवारी होणार असून एकूण २ लाख १४ हजार उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात जमावबंदी लागू करण्यात आली असून विजयी उमेदवारांना मिरवणुका काढण्यास, फटाके फोडण्यास तसेच गुलाल उधळण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख याबाबत आदेश जारी केले आहेत.
राज्यात कोरोनाचं संकट कायम असल्याने निवडणूक निकालानंतर मिरवणुका निघू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार आज (सोमवार) पहाटे 12 पासून ते रात्री 12 पर्यंत दिवसभर मिरवणुका काढणे, रॅली काढणे, फटाके फोडणे, गुलाल उधळणे या सर्व गोष्टींना बंदी घालण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच सोमवारी रात्री 10 वाजल्यापासून मंगळवारी पहाटे 6 वाजेपर्यंत हॉटेल, ढाबे, खानावळी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देशमुख यांनी दिला आहे.
खरंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यात निकालानंतर गुलाल उधळत विजयी मिरवणुका काढणं, गुलाल उधळणं, फटाके फोडणं आणि विजयी उमदेवारांचे अभिनंदन करणारे फ्लेक्स लावणे महागात पडू शकते. ग्रामपंचायत निकालाच्या पार्श्वभूमीवर हे सर्व प्रकार करण्यास मज्जाव करण्यात आला असून हा प्रकार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. पुण्यासह काही जिल्हाधिकाऱ्यांनी अशाप्रकारे बंदीचे हे आदेशच जारी केले आहेत. सोलापूरमध्ये विजयी उमेदवारांना जल्लोष करण्यास मनाई करण्यात आली आहे. तर नाशिक जिल्ह्यातही विजयानंतर मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली असून कोल्हापूर जिल्ह्यात तर कोरोनामुळे 31 जानेवारीपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच वसईतही निवडणूक विजयाचा जल्लोष करण्यास मनाई करण्यात आली आहे.