गोरखपूरमधील अर्भक मृत्यूंची घटना रुग्णालयाच्या अंतर्गत राजकारणातून – योगी आदित्यनाथ
गोरखपूर येथील बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या वर्षी ६० अर्भकांचा मृत्यू झाला होता. मात्र हे बळी प्राणवायूच्या कमतरतेमुळे नव्हे तर रुग्णालयातील अंतर्गत राजकारणातून होते, असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केला आहे. तसेच या घटनेचा विनाकारण बाऊ करण्यात आल्याची नाराजी व्यक्त केली.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या रुग्णालयात आठवडाभरात ६० मुलांचा बळी गेला होता, त्यात प्रामुख्याने नवजात बालकांचा समावेश होता. प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला पैसे अदा न केल्याने हा प्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र उत्तर प्रदेश सरकारने हा आरोप फेटाळला होता. या घटनेनंतर राज्याचे आरोग्य संचालक, आरोग्यमंत्री व वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना तातडीने घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले होते. दुसऱ्या दिवशी मी रुग्णालयात भेट दिल्यावर प्राणवायूचा तुटवडा नसल्याचे निदर्शनास आले होते. जर प्राणवायूचा तुटवडा असता तर व्हेंटिलेटवर जी मुले आहेत ती पहिल्यांदा दगावली असती, असे आदित्यनाथ यांनी सांगितले. या प्रकरणात वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. कफील खान यांना अटक करण्यात आली होती. त्यांना आता जामिनावर सोडण्यात आले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी याची चौकशी करून नऊ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे, त्यात खान यांचा समावेश आहे.
मुलांच्या मृत्यूच्या संख्येबाबत चौकशी करताना, वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या अंतर्गत राजकारणाचा हा परिणाम असल्याचे समजल्याचे आदित्यनाथ यांनी सांगितले. या मुद्दय़ावर डॉक्टरांचेच समुपदेशन आम्हाला करायला लागणे हे वेदनादायी आहे. तसेच मेंदूज्वर या आजाराच्या कारणाचा अभ्यास करा व हातात जी जबाबदारी आहे ती पार पाडा, असा सल्लाच डॉक्टरांना दिल्याचे आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.