गोदावरीला पूर; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
शुक्रवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने नाशिक शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुक्काम ठोकल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे गोदावरीसह उपनद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार पावसाने हजेरी लावली आहे.
दरम्यान, येथे पुढील काही तासांमध्ये अतिवृष्टिची शक्यता वर्तवण्यात आली असून गोदावरी नदीमधील पाणी पातळी वाढल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरात पावसाच्या संततधार सरींनी मुक्काम ठोकला आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरीतही चांगली हजेरी लावल्याने भात लावणीला गती आली. जिल्ह्यात रविवारी सकाळी साडेआठपर्यंत २४ तासांत ६४४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये १३५ मिलीमीटर तर इगतपूरीत १७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे बाजारपेठांवरही विपरित परिणाम झाला आहे. विद्यार्थी, पालक, व्यावसायिक सर्वांचीच पावसामुळे तारांबळ उडाली.