गेट वे ऑफ इंडिया’ येथील प्रवासी जेट्टी बांधण्याचा सागरी मंडळाचा निर्णय
मुंबई | गेट वे ऑफ इंडिया’ येथील प्रवासी जलवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रेडिओ क्लब, अपोलो बंदर येथे नवीन प्रवासी जट्टी बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र सागरी मंडळाने घेतला आहे. या जेट्टीवर एकाचवेळी २० बोटी उभ्या करता येतील, अशी व्यवस्था केली जाणार आहे. तसा प्रस्ताव मंडळाने केंद्र सरकारकडे पाठवला आहे.
‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून जलप्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात दरवर्षी १० टक्क्यांची भर पडते. सध्या येथून दरवर्षी सुमारे २६ लाख प्रवासी प्रवास करतात. तिथे केवळ दोनच धक्के असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. ती लक्षात घेऊन आणि या जेट्टीवरील ताण कमी करण्यासाठी रेडिओ क्लबजवळ धक्का बांधण्याचा निर्णय सागरी मंडळाने घेतला आहे, अशी माहिती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांनी दिली. येथे १० ठिकाणी २० बोटी उभ्या करण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्याचा प्रस्ताव मंडळाने केंद्राकडे पाठवला आहे, असे त्यांनी सांगितले.