गणेशोत्सवात मुंबईकरांना कोकणबंदी केल्यास तीव्र आंदोलन पुकारू – नारायण राणे
मुंबई | गणेशोत्सवात कोकणी माणसाला गावी जाण्यास परवानगी मिळेल की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला असून गणेशोत्सवात कोकण बंदी केल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी दिला आहे. ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.
नारायण राणे म्हणाले, चाकरमानी मुंबईत नोकरीला असले तरी त्यांचे कुटुंब कोकणात असते. त्यामुळे गणेशोत्सवात चाकरमानी कोकणात जात असतो. गणेशोत्सव कोकणी माणसांसाठी अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे. यंदा कोरोना असला तरी गणेशोत्सवात कोकणी माणसाला गावाला जाण्यास कोणी बंदी घालू नये. अद्यापपर्यंत कोकणबंदीचे आदेश निघालेले नाहीत. आम्ही तसा आदेश निघू देणार नाही. कोकणात जाण्यास बंदी घातल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. तो घराकडे जाणारच. त्यासाठी ई-पासची सक्ती वगैरे घालू नये. आमचा कोकणात जाण्यासाठी ई-पास सुरू करण्यासही विरोध राहील, असंही ते म्हणाले.
कोकण बंदीवरून टीकास्त्र सोडल्यानंतर त्यांनी लॉकडाऊनवरही ताशेरे ओढले. लॉकडाऊनबाबात राज्यभर सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. सरकारी यंत्रणेवर विश्वास नसल्यानेच स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घेतले जात आहेत. हे चुकीचं आहे. सरकारने लोकप्रतिनिधी ऐवजी प्रशासनाशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा, असं आवाहन करतानाच सरकारच्या या धोरणामुळे त्यांचा प्रशासनावर विश्वास नसल्याचं दिसून येतं, असा टोलाही त्यांनी लगावला.