कोल्हापुरात खड्ड्यात आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध
पिंपरी | प्रतिनिधी
भारत बंदचे शेतकरी संघटनांनी आयोजन केले होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुर येथील क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे माजी नगरसेवक अमोल गणपतराव माने आणि सुहास आजगेकर यांनी खड्ड्यात आंदोलन केले. या वेळी हातात फ्लेक्स घेऊन केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.
या आंदोलनात कुमार चौगुले, सागर दाशाळ, कुमार दाशाळ, विठ्ठल आडुळकर, अक्षय अर्जुनगी, अक्षय चाबूक यांनी सहभाग घेतला.
माने म्हणाले की, हजार वर्षांपूर्वी बळीराजाला वामनाने गाडल होते. खरे म्हणजे ही लढाई भांडवलशाही अर्थव्यवस्था विरुद्ध कृषी अर्थव्यवस्था अशी लढाई आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेने कृषी अर्थव्यवस्थेला नष्ट केले. त्या बळीराजाला पाताळात गाडण्याचा अर्थ निघतो. या बळीराजाला अभिवादन करून आज प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले.
राजधानी दिल्लीतील शेतकऱ्यांनी त्यांच्या न्याय हक्काचा लढा उभा केलेला आहे. नवी आलेले कृषी विधेयके अन्यायी असल्यामुळे शेतकऱ्यांनी सनदशीर मार्गाने संघर्ष उभा केला आहे. नवीन कायद्याने बळीराजा प्रमाणे आजचा शेतकरी ही गाढला जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही अविरतपणे भविष्यात सुद्धा संघर्ष करत राहू, असे प्रतिपादन या वेळी माने यांनी केले.