केंद्रीय गृहमंत्री अमितभाई खरं बोलले म्हणून शिवसेनेला झोंबले
– भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रत्त्यूत्तर
– चिंचवडमध्ये पद्मश्री गिरीश प्रभूणे यांची घेतली भेट
पिंपरी । प्रतिनिधी
खरं बोलले की झोंबते, अमित शाह खरं बोलले ते फार झोंबले त्यामुळे ज्याला ज्याला जसं जमलं ज्यांनी ‘माईल्ड’ प्रतिक्रिया दिली, त्यांना दम दिला गेला. दुसऱ्या दिवशी त्याच माणसाने ‘पुन्हा स्ट्रॉंग’ प्रतिक्रिया द्यायची, त्यामुळे अमित शाहा शिवसेनेबद्दल जे बोलले ते खरे होते, त्यामुळेच ते झोंबले, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
श्री. पाटील यांनी चिंचवड गाव येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
अमित शाहांच्या पायगुणाने महाविकास आघाडीचं सरकार जावं असं नारायण राणे म्हणाले होते. त्याला शिवसेनेने सामनातून उत्तर दिलं होतं. अमित शहा यांच्या पायगुणाने महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे सरकार जाईल अशी स्वप्ने पाहणाऱ्यांविषयी काय बोलावे? असा सवाल सेनेने उपस्थित केला होता.
दरम्यान, सिंधुदुर्गातील नगरसेवक शिवसेनेत जाणे आणि अमित शाह यांचे वक्तव्य याचा कसलाही संबंध नाही, अमित शाहांच्या पायगुणाने सरकार जाणार असेल ते जाईल अमित शाह यांनी शिवसेना संपण्याची भाषा केली नाही, पण मागच्या १५ महिन्यात ज्या पद्धतीने सरकारचा कारभार चालला आहे, तो आमच्या सरकार वेळी राहिला असता, तर शिवसेना संपली असती, असं वक्तव्य त्यांनी केले आणि ही वस्तूस्तिथी आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
*
सेनेला पराचा कावळा करण्याची सवय…
भाजपाला कुणाला घाबरण्याचे कारण नाही. अमित भाईंनी शिवसेना संपवण्याची भाषा करण्यापेक्षा शिवसेनेला असा सल्ला देणं, आवाहन करणं किंवा सरकार आहे. तेव्हा जुने हिशेब काढण्याचा तो मुद्दा होता. तरीही शिवसेनेला आणि संजय राऊतांना पराचा कावळा करण्याची सवय आहे. त्यामुळे ते शिवसेनेला संपवणार, मसनात गेले, काय काय बोलले”. भाजपा हा पक्ष असा आहे कुणाला घाबरत नाही. आम्ही कुणाला घाबरत नाही, जे बोलायचं ते छातीठोकपणे बोलतो. समोरच्याला टाकून बोलणं, लागून बोलणं अशी आमची संस्कृती नाही, असेही पाटील म्हणाले आहेत.
*
सरकार यायचं असेल, तर येईल…
वैभववाडीमध्ये १७ पैकी १७ सदस्य भाजपचे आहेत, राणे साहेब भाजपचे नेते झाले, त्यांचा मुलगा आमदार झाले. १७ पैकी ६ नगरसेवक शिवसेनेत गेले हे जाणं-येणं त्या-त्या वेळी होत असतं. अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्रात सरकार येईल आणि वैभववाडीत ६ नगरसेवक गेले त्याचा काही संबंध नाही. अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्रात सरकार यायचं असेल तर येईल, असेही पाटील यांनी नमूद केले आहे.