काश्मीर सीमेवरील मोर्चाबाबत भारताचा सज्जड इशारा
दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांनी पाकिस्तानी लष्कराच्या पाठिंब्याने प्रत्यक्ष सीमेवर शुक्रवारी मोर्चा आयोजित केल्याच्या पाश्र्वभूमीवर, पाकिस्तानमधील कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी नियंत्रण रेषेचे पावित्र्य राखले जाईल हे निश्चित करायला हवे, असे भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्यासाठी घटनेच्या अनुच्छेद ३७० मधील तरतुदी रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयाविरोधात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
पाकिस्तानी लष्कर पाकव्याप्त काश्मीरमधील काश्मिरी लोकांचा तोफेच्या तोंडी देण्यासाठी वापर करीत असून, नियंत्रण रेषेवर घडणाऱ्या कुठल्याही अनुचित घटनांचा सामना करण्यासाठी भारतीय सुरक्षा दले तयार आहेत, असे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानी नेत्यांच्या जाहीर भाषणांची लष्कराला कल्पना असल्याचेही ते म्हणाले.