देशात आजपासून धावणार ८० विशेष रेल्वे
नवी दिल्ली – देशातील लॉकडाऊन हळूहळू शिथिल होत असताना लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवासही सुरळीत होत आहे. विशेष रेल्वेच्या संख्येत आता वाढ करण्यात येणार असून आजपासून देशात ८० नव्या रेल्वे गाड्या धावणार आहेत. या गाड्यांसाठी १० सप्टेंबर पासून तिकीट आरक्षणास सुरुवात झाली आहे.
आगामी काळ प्रमुख सणासुदीचा काळ असल्याने रेल्वेकडून विशेष ट्रेनची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दिसत आहे. दसरा, दिवाळी, छठ पूजासारखे सण पुढील काळात असल्याने या दरम्यान रेल्वेची संख्या वाढवण्याची मागणी होत असते. शिवाय, रेल्वेंमध्ये गर्दी देखील वाढत असते. ही बाब लक्षात घेता रेल्वेकडून ८० नव्या विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई, कोलकाता, लखनऊ, पाटणा, दिल्ली या मार्गांवर विेशेष रेल्वे धावणार आहेत. सध्या विशेष रेल्वेच्या नावाने २३० एक्स्प्रेस रेल्वे चालवल्या जात आहेत. ज्यामध्ये ३० राजधानी एक्स्प्रेसचा समावेश आहे.
पाच महिन्यानंतर मध्य रेल्वेवरील पहिली राज्यांतर्गत विशेष सीएसएमटी-मनमाड रेल्वे गाडी शनिवारी १२ सप्टेंबरला धावणार आहे. सीएसएमटीहून गाडी क्रमांक ०२१०९ सायंकाळी १८.१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी मनमाडला रात्री २२.५० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०२११० मनमाडहून सकाळी ०६.०२ वाजता सुटेल आणि सीएसएमटीला सकाळी १०.४५ वाजता पोहोचेल. दादर, कल्याण, देवळाली, नाशिक रोड, निफाड, लासलगाव स्थानकात या गाडीला थांबा असेल. आसन प्रकारातील द्वितीय श्रेणीचे १७ डबे आणि तीन वातानुकीत आसन कार गाडीला असतील.