काल भरवला खजूर; आज ठोकला केजरीवालांवर मानहानीचा दावा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमोरील समस्यांमध्ये वाढ झाली आहे. आज (मंगळवारी) भारतीय जनता पार्टीचे नेते विजेंद्र गुप्ता यांनी अरविंद केजरीवार आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचे म्हणत आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप गुप्ता यांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 6 जून रोजी होणार आहे. यात महत्त्वाची बाब अशी की 3 जून रोजी इफ्तार पार्टीमध्ये अरविंद केजरीवाल आणि विजेंद्र गुप्ता एकत्र भेटले होते. तसेच यावेळी गुप्ता यांनी खजूरही भरवला होता. त्यानंतर दोघांचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
नुकतेच गुप्ता यांनी एक ट्विट केले आहे. मुख्यमंत्री केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आपल्यावर मुख्यमंत्र्यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोपात सहभागी असल्याचे म्हणत आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवून सात दिवसांमध्ये माफी मागण्यास सांगितले. परंतु या नोटीसला उत्तर न मिळाल्यामुळे पटियाला उच्च न्यायालयात मानहानीचा दावा ठोकला असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. याव्यतिरिक्त गुप्ता यांनी केजरीवाल आणि सिसोदिया यांच्याविरोधात पोलिसांतदेखील तक्रार दाखल केली आहे.