कांदा निर्यातबंदीनंतर कांद्याच्या दरात वाढ
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी बाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात एकीकडे जोरदार आंदोलने सुरू आहेत तर दुसरीकडे कांद्याचे भाव मात्र वाढताना पहायाला मिळत आहेत. नगर जिल्ह्यात पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये रविवारी एक नंबर कांद्याला ५१ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. घोडेगावला ४०, तर नगरला ३२ रुपये प्रति किलो भाव मिळाला. बाहेरच्या राज्यांतून मागणी वाढल्याने कांद्याला चांगला भाव मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.
देशात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात करण्यास बंदी घातली आहे. यामुळे कांद्याचे भाव कोसळतील, असा आरोप करून विरोधी पक्षांनी आंदोलने सुरू केली आहेत. केवळ विरोधकच नव्हे तर सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधीही यासंबंधी सरकारकडे पाठपुरावा करून निर्यातबंदी मागे घेण्याची मागणी करीत आहेत. बाजारात मात्र वेगळे चित्र पहायला मिळत आहे. किरकोळ विक्रीच्या बाजारात कांद्याचे भाव चढेच आहेत. आता बाजार समितीत कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या कांद्यालाही चांगला भाव मिळत असल्याचे नगर जिल्ह्यात पहायला मिळत आहे.
निर्यातबंदी होण्यापूर्वी ३० ते ३२ रुपये भाव मिळत होता. निर्यातबंदीचा निर्णय झाला, त्यानंतर एक दोन दिवस भाव थोडा कमी झाला होता. निर्यातबंदीचे पुढे काय होते, याची प्रतीक्षा असल्याने शेतकऱ्यांनी कांदा विक्री कमी केली. त्यातच दक्षिण भारतातून कांद्याला मागणी वाढली. तेथील व्यापारी महाराष्ट्रात येऊन कांदा खरेदी करत आहेत. त्या भागात पाऊस झाल्याने तेथील लाल कांदा बाजारात उपलब्ध होत नसल्याने त्यांना महाराष्टातून कांदा न्यावा लागत आहे, यामुळे निर्यातबंदी असूनही सध्या भाव वाढले असल्याचे जाणकरांचे मत आहे.