breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

कंगना पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; शेतकरी आंदोलकांनाच दहशतवादी म्हणाली

संसदेच्या दोन्ही सभागृहांत कृषी विषयक विधेयके संमत झाली असताना व त्या विरोधात शेतकरी आंदोलन भडकलं आहे. मात्र आता काहीही संबंध नसताना या वादातही अभिनेत्री कंगना राणावतने उडी घेतली आहे. कंगना राणावत आता नव्या वादामुळे चर्चेत येण्याची शक्यता आहे. कृषी विषयक विधेयकांवरून केंद्र सरकारविरुद्ध शेतकरी रस्त्यावर उतरू लागला असताना व हे आंदोलन चिघळत चालले असतानाच कंगनाने या आंदोलकांना दहशतवादी म्हटल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी विषयक विधेयकांवर शेतकऱ्यांना आश्वस्त करणारं एक ट्विट केलं आहे. त्यात एमएसपी व्यवस्था यापुढेही सुरू राहणार आहे. शेतीमालाची खरेदी सरकार करणार आहे. आम्ही येथे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहोत. बळीराजाच्या साह्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत आणि बळीराजाच्या पुढील पिढ्यांचं जीवन समृद्ध करण्याचा आमचा हेतु राहणार आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले होते. कृषी विषयक विधेयकांना प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने केलेला विरोध, विधयके दोन्ही सभागृहात संमत झाल्यानंतर पंजाब व हरयाणात भडकलेलं आंदोलन, विविध शेतकरी संघटनांनी दिलेला आंदोलनाचा इशारा या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न या ट्विटच्या माध्यमातून केला. मात्र, हे ट्विट एम्बेड करत कंगना राणावतने मतप्रदर्शन केले असून कंगनाचं ट्विट नव्या वादाला तोंड फोडणारं ठरलं आहे.

कंगनाने सीएए विरुद्ध झालेल्या आंदोलनाचा संदर्भ देत कृषी विषयक विधेयकांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर निशाणा साधला. ‘पंतप्रधान मोदी जी, जे झोपले आहे त्यांना जागे करता येईल, ज्यांचा गैरसमज झाला आहे त्यांची समजूत काढता येईल मात्र, जे झोपेचं सोंग करत आहेत, काहीच समजत नाही असा आव आणत आहेत, त्यांना तुम्ही कितीही समजावून सांगितलं तरी काय फरक पडणार आहे? हे तेच दहशतवादी आहेत ज्यांनी CAA ला विरोध केला होता. सीएए विरुद्ध आंदोलन करून रक्ताचे पाट वाहिले होते, प्रत्यक्षात मात्र एकाही व्यक्तीचं नागरिकत्व या कायद्याने हिरावलं गेलं नाही’, अशा प्रकारचं ट्विट कंगनाने केलं आहे.

दरम्यान, कंगनाच्या या ट्विटवर तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काँग्रेसने कठोर शब्दांत या ट्विटचा समाचार घेतला आहे.

‘कंगना राणावत आता शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली. यासाठी मोदी सरकार आणि भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी सर्व शेतकऱ्यांची माफी मागायला हवी. मोदी सरकारने दिलेली वाय श्रेणी सुरक्षा व पाठिंब्यामुळेच भाजपची ही ‘झांसे की रानी’ इतकी शेफारली आहे. आम्ही भाजप व कंगना या दोघांचाही निषेध करत आहोत’, अशा शब्दांत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी निषेध नोंदवला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button