कसाबला जिवंत पकडणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या टीमला रँक प्रोमोशन – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई | महाईन्यूज |
26/11 च्या मुंबई हल्ल्यात दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या टीमला एक रँक प्रोमोशन दिले जाणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान भवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना बुधवारी ही घोषणा केली आहे. कसाबला जिवंत पकडण्यासाठी कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी तुकाराम ओंबळे यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांच्याच टीमला आता सन्मानित केले जाणार आहे.
गृहमंत्री म्हणाले, “26/11 च्या हल्ल्याच्या वेळी कसाबला जिवंत पकडताना तुकाराम ओंबळे शहीद झाले होते. त्यांच्यासोबत त्यांची 14 जणांची टीम होती. त्याच टीमचे एक रँक वाढून पदोन्नती दिली जाणार आहे.”
26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानचे 10 दहशतवादी समुद्रामार्गे मुंबईत घुसले. तसेच बेछूट हल्ले करून त्यांनी 18 पोलिस आणि सुरक्षा रक्षकांसह 166 जणांचा जीव घेतला. सोबतच, कोट्यधी रुपयांचे नुकसान झाले. त्यांना रोखण्यासाठी झालेल्या मोहिमेत 10 पैकी 9 दहशतवाद्यांना जागीच कंठस्नान घालण्यात आले. परंतु, कसाब हाच एकमेव जिवंत पकडण्यात आला होता. यानंतर कसाबची कसून चौकशी केल्यानंतर त्याला 21 नोव्हेंबर 2012 रोजी फाशी देण्यात आली.