आळंदीमधील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली, मोकळा श्वास कधी घेणार?
पिंपरी : लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान म्हणून आळंदीकडे बघितलं जातं. याच आळंदीमधील इंद्रायणी नदीमध्ये पुन्हा एकदा केमिकलयुक्त पाणी सोडल्याने नदी प्रदूषित झाली आहे. इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त म्हणून मोकळा श्वास कधी घेणार, असा प्रश्न वारकरी आणि ग्रामस्थांना पडला आहे.
इंद्रायणी नदी मोठ्या प्रमाणात जलप्रदूषणामुळे फेसाळली आहे. रसायनयुक्त फेस मोठ्या प्रमाणात नदीच्या पाण्यावर दिसत आहे. पिंपरी चिंचवडमधील कंपन्यांचे हे पाप असल्याचं वेळोवेळी उघड झाल आहे. त्या कंपन्या रसायनयुक्त पाणी नदीत सोडून वारकरी आणि ग्रामस्थांच्या जीवाशी खेळत आहेत.
हेही वाचा – ICCने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला दिला मोठा धक्का! क्रिकेट बोर्डाचे सदस्यत्व निलंबित
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी आळंदीमध्ये येऊन इंद्रायणी नदी ही प्रदूषणमुक्त करणार असल्याचे आश्वासन दिल होते. मात्र, मुख्यमंत्र्यांना त्या आश्वासनाचा विसर पडल्याचा आरोप आता आळंदीमधील वारकरी करत आहेत. शासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि इंद्रायणी प्रदूषणमुक्त करावी, अशी मागणी सातत्याने वारकरी करत आहेत.